Update : आधी बालगृहातील लाइट फोडून जखमा करून घेतल्या, नंतर दगड, चाकू, लोखंडी रॉड घेऊन रक्‍तबंबाळ अवस्थेत रस्त्याने धावत होत्या ९ मुली!; छावणी ते जिल्हाकोर्ट-रेल्वेस्थानकादरम्यानचा थरारपट

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी येथील शासकीय बालसुधारगृहातून एकाचवेळी ९ अल्पवयीन मुलींनी सोमवारी (३० जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास पलायन केले. बालसुधारगृहातील लाइट फोडून हातांवर जखमा करून घेत दगड, चाकू, लोखंडी रॉड हाती घेऊन त्‍या पळत सुटल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बालसुधारगृहाच्या निरीक्षकांना ही बाब लक्षात येईपर्यंत त्‍या बऱ्याच दूरपर्यंत गेल्या. छावणी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी येथील शासकीय बालसुधारगृहातून एकाचवेळी ९ अल्पवयीन मुलींनी सोमवारी (३० जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास पलायन केले. बालसुधारगृहातील लाइट फोडून हातांवर जखमा करून घेत दगड, चाकू, लोखंडी रॉड हाती घेऊन त्‍या पळत सुटल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. बालसुधारगृहाच्या निरीक्षकांना ही बाब लक्षात येईपर्यंत त्‍या बऱ्याच दूरपर्यंत गेल्या. छावणी पोलिसांसह दामिनी पथकाने तातडीने धाव घेऊन मुलींची धरपकड सुरू केली. त्‍यातील ७ जणींना पकडण्यात यश आले, २ मुली पळून जाण्यात यशस्वी झाल्या आहेत. नगर नाका ते बाबा पेट्रोलपंप चौक- जिल्हा कोर्ट-रेल्वेस्थानकादरम्‍यान हा थरार घडला.

घर सोडलेल्या, एखाद्या गुन्ह्यात सापडलेल्या मुली, तरुणींना छावणीतील विद्यादीप शासकीय बाल सुधारगृहात ठेवले जाते. बालसुधारगृहाबद्दल आतापर्यंत अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सुविधांच्या कमरतेसह अनेक समस्यांचा सामना मुलींना करावा लागत असल्याचे अनेकदा चव्हाट्यावर आले आहे. मात्र तरीही प्रशासनातील वरिष्ठांनी हे गांभीर्याने घेतले नाही. त्‍यातूनच ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. एकाचवेळी ९ मुलींनी पलायनाचा प्लॅन रचला आणि तो आज सकाळी साडेदहाला पूर्णत्‍वास नेला.

सूत्रांच्या माहितीनुसार, बालसुधारगृहात दाखल केल्यापासूनच आक्रमक असलेल्या या ९ मुलींची काही दिवसांपासून एकजूट होऊ लागली. त्यांना सुधारगृहात राहायचे नव्हते. बाल कल्याण समितीकडे त्‍यांनी तशी मागणीही केली होती. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी दुपारी बाल कल्याण समितीच्या अधिकारी सुधारगृहात येणार असल्याचे त्‍यांना सांगण्यात आले. मात्र साडेअकराला अचानक या ९ मुली आक्रमक झाल्या. बालगृहातील रॉड, चाकू हाती घेऊन त्‍यांनी लाइट फोडले. हातांवर जखमा करून घेतल्या. रक्‍तबंबाळ अवस्थेत भिंतीवरून उड्या मारून अनवाणीच पळ काढला. रस्त्यात कोणी पकडू नये म्‍हणून हातात दगड, काचा, रॉड, चाकू घेऊन पळत होत्‍या. ते दृश्य पाहून नागरिकही हादरून गेले.

नगर नाका ते बाबा पेट्रोलपंप चौकापर्यंत त्‍या पळत होत्‍या. याप्रकाराची माहिती पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार यांना मिळताच त्‍यांनी ४ पथके मुलींच्या शोधात पाठवली. यात छावणी पोलीस, दामिनी पथक, भरोसा सेलच्या महिला पोलीस या मुलींच्या शोधात बाबा पेट्रोलपंप चौकाकडे धावल्या. जिल्हा न्यायालयासमोर ५ मुली तर २ मुली रेल्वेस्थानक परिसरात मिळाल्या. दोघी गर्दीत मिसळून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. त्‍यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. सातही मुलींना तत्‍काळ घाटी रुग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या कपड्यांत खिळे, काचा मिळून आल्या. त्यानंतर बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. मुलींच्या पालकांनाही बोलावण्यात आले. पोलिसांनी समजूत घातल्यानंतर ४ मुलींचे पालक त्‍यांना घरी घेऊन जाण्यास तयार झाले. मात्र ३ मुलींच्या पालकांनी त्‍यांना स्वीकारण्यास नकार दिला. जबाब नोंदवले जात असतानाही मुली आक्रमक होत्या. तेव्हाही त्यांनी घरी जाण्यास नकार दिला. तिघींनी तर पालकांकडे पाहिलेही नाही. रात्री उशिरा त्यांना साताऱ्यातील अनाथालयात स्थलांतरित करण्यात आले.

बालसुधारगृहात केले जात होते टॉर्चर
पळून जाणाऱ्या मुलींनी केलेल्या तक्रारींमुळे बालसुधारगृहातील टॉर्चरवर प्रकाश पडला आहे. बाल कल्याण समितीच्या कार्यपद्धतीवरही मुलींनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. बालसुधारगृहात आक्रमक झाल्या तेव्हा त्‍यांनी म्‍हटले आहे, की बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना आमच्यासमोर आणू नका. अन्यथा आम्‍ही त्यांनाही बदडून काढू. शिक्षा म्‍हणून मारहाण केली जाते. आठवडाभर पुरेल इतकाच लहान साबण दिला जातो. टूथपेस्ट अपुरी, विशिष्ट धर्म मानणाऱ्या मुलींवर मानसिक दबाव, कर्मचाऱ्यांचे वागणे त्रासदायक असते. याप्रकाराबद्दल बालकल्याण समिती अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांनी प्रतिसादच दिला नाही.

सुधारगृहात पोलिसांकडून चौकशी
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, गीता बागवडे, प्रवीणा यादव यांनी रात्री उशिरा बालसुधारगृहात जाऊन ८० मुलींची चौकशी करत समस्या समजून घेतल्याचे छावणीचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले. पोलीस सूत्रांनी सांगितले, की १७ वर्षांच्या ५ मुली प्रियकरासोबत पळून गेल्या होत्‍या. त्‍यांच्या पालकांनी अपहरणाची तक्रार दिल्यानंतर शोध घेऊन पोलिसांनी परत आणले होते. त्‍यांनी घरी राहण्यास नकार दिल्याने बालसुधारगृहात ठेवले होते. दोन मुलींनी वाद झाल्याने घर सोडले होते, तर एका मुलीवर मानसिक उपचार सुरू आहेत. हेही वाचा : Exclusive : छावणीचे विद्यादीप बालसुधारगृह जेलमध्ये रुपांतरीत कसे झाले? – chhatrapatisambhajinagarcitynews

आणखी महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे

Latest News

काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे काँग्रेसने राज्‍यात खेळले ओबीसी-महिला कार्ड, १३ जिल्हाध्यक्षांसह कार्यकारिणी जाहीर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील डोणगावकर, राजकीय व्यवहार समितीत खा. कल्याण काळे
मुंबई (सीएससीएन न्यूजडेस्क) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता १३ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली...
धक्कादायक : काल्डा कॉर्नरजवळ ३ टवाळखोरांचा कहर, कार अडवून दोन तरुणांना बेदम मारहाण करत कारच्या काचा फोडल्या, गर्दी जमू लागताच कारमधील पैसे घेऊन पसार
छत्रपती संभाजीनगरच्या ‘या’ गावात झाला जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा!; १३५ क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद, तात्या बाबांची महती का आहे इतकी मोठी, जाणून घेऊ...
बैल संतापला, दोन मालक जिवानीशी गेले!, सोयगाव तालुक्‍यातील घटनांनी शेतकरी हादरले!!
औरंगाबाद म्हण नाहीतर बहुत मारेंगे म्हणणाऱ्या केळी विक्रेत्‍याविरुद्ध संतापाची लाट, अजिंठ्यात हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software