छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खा. संदिपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांना हैदराबादच्या प्रसिद्ध सालार जंग यांच्या कुटुंबाने १५० कोटींची जमीन भेट दिली आहे. ॲड. मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एका सामान्य ड्रायव्हरला १.५ अब्ज रुपयांची भेट दिल्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. एकीकडे पत्रकारांना मुलाखती देऊन भुमरे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे सांगणाऱ्या जावेद यांना पोलिसांकडे येण्यास आणि पोलिसांनी केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यास वेळ मिळालेला नाही. नोटीस बजावूनही जावेद आणि हिबानामा म्हणजेच देणगी पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या सालारजंग वंशज मीर महेमूद अली खान चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत आले नाहीत. आता सोमवारी (३० जून) जमीन व व्यवहाराच्या मूळ कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याची नोटीस दोघांना बजावण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
ॲड. मुजाहिद इकबाल खान समीरउल्ला खान (रा. परभणी) यांच्या तक्रारीनुसार, सालारजंग वंशज मीर महेमूद अली खान यांनी भुमरेंकडून मोठी रक्कम घेऊन जावेद रसूल शेख याच्या नावे बनावट हिबानामा करून दिला आहे. भुमरे यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हिबानामा कायदेशीररित्या केवळ रक्ताच्या नातेवाईकांमध्येच वैध आहे. सालार जंगचे वंशज आणि ड्रायव्हर केवळ असंबंधित नाहीत तर ते इस्लामच्या दोन वेगवेगळ्या पंथांचे आहेत. सालारजंग घराण्याचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते. हिबानामा म्हणजे एक कायदेशीर दस्तऐवज, ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीला कोणताही आर्थिक मोबदला न घेता भेट स्वरुपात देते.
यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने बोलावल्यानंतर जावेदने हजर होत प्राथमिक जबाब नोंदवला होता. नंतर बोलावूनही तो आला नाही. दुसरीकडे पत्रकारांकडे मात्र भुमरेंचा कोणताही संबंध नसल्याच्या मुलाखती देताना दिसला आहे. महेमूद चक्क वारंवार बोलावूनही आलेलेच नाहीत. दूध डेअरी सिग्नल ते काल्डा कॉर्नर मार्गावर हा अंदाजे १५० कोटींचा पडीक भूखंड आहे. चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय पोलीस घेणार आहेत. दरम्यान, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लक्षवेधक आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या चौकशा लावल्याचा आरोप त्यांनी केला. खैरेंचा आरोप केवळ राजकीय स्टंट असल्याचे आ. विलास भुमरे म्हणाले.