छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पहिला दारूडा होता, खूप त्रास द्यायचा, वैतागून तिने त्याच्यापासून फारकत घेतली. दुसरे आंतरजातीय लग्न केले. तो पहिल्यापेक्षा एक पाऊल पुढे निघाला. रोज दारू पिऊन यायचा अन् तिला कुटत (मारहाण) बसायचा… दीर वाईट बोलायचा, जाऊ राबवून घ्यायची… त्रास असह्य होत गेला, परत जाण्याचे मार्ग संपले होते, अखेर तिने गळफास घेऊन आयुष्य संपवले… ही घटना शनिवारी (२६ एप्रिल) सकाळी ११ च्या सुमारास सातारा परिसरातील देवळाई भागात घडला.
ज्योती शैलेश पाध्ये (रा. हिमालया रेसिडेन्सी, खडी रोड, देवळाई) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी पती शैलेश शरदराव पाध्ये, सासू मंगल, दीर योगेश, जाऊ गायत्री, चुलत सासरा मुकुंद आणि त्याची पत्नी (रा. कळमनुरी, जि, हिंगोली) यांच्याविरुद्ध रविवारी (२७ एप्रिल) गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरुद्ध ज्योतीची आई चंद्रकला सुरेश सोनवणे (रा. पिसादेवी रोड) यांनी तक्रार दिली.
तक्रारीनुसार, ज्योतीचे पहिले लग्न २०११ मध्ये चिकलठाण्यातील एका तरुणाशी झाले होते. मात्र, तो दारूडा निघाला. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने घटस्फोट घेतला. नंतर शैलेशने तिला लग्नासाठी मागणी घातली. पहिल्या लग्नाबद्दल आणि जाती वेगळ्या असल्याबद्दल ज्योतीने त्याला सर्व सांगितले होते. तरीही तो लग्नाला तयार झाला. १३ मार्च २०२३ रोजी शैलेशसोबत ज्योतीचा विवाह झाला. लग्नानंतर दोनच महिने शैलेशने तिला चांगले वागवले. नंतर दारू पिऊन घरी येत तिला मारहाण करू लागला.
सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. चुलत सासरा मुकुंद आणि त्याची पत्नी त्यांना भडकावून द्यायचे. दीर तिला वाईट बोलायचा. ज्योतीला एकटीलाच घरातील सर्व कामे करायला लावायचे. जाऊ गायत्री चहापासून जेवणापर्यंत सर्व बेडवर तिला आणून द्यायला सांगायची. एवढे करूनही ज्योतीला पुरेसे खायला सुद्धा दिले जात नव्हते. कालांतराने ज्योती आणि शैलेश वेगळे राहू लागले, तरी शैलेशच्या वागण्यात काही फरक पडला नाही. अखेर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.