छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नाथषष्ठी निमित्त पैठण येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सपत्निक विधीवत पूजा करण्यात आली. आ. विलास भुमरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार दत्ता भारस्कर उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी आलेल्या दिंड्यांमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांच्या भेटी घेऊन विचारपूस केली. आज, २० मार्चला सकाळी सात वाजता ही पूजा करण्यात आली.

नाथषष्ठी यात्रोत्सवासाठी यंदा एकूण ६२७ पायी दिंड्या पैठण व परिसरात दाखल झाल्या आहेत. सुमारे लाखभर वारकरी मुक्कामी आहेत. पैठण नगर परिषदेच्या वतीने या सर्व दिंड्यांच्या नोंदी करून क्रमांकाचे बिल्ले दिले जातात. त्यांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून ३९ तर नाशिक येथून ४४ दिंड्या पायी दाखल झल्या आहेत. पुणे २०, वाशीम ३, अकोला ५, यवतमाळ २, जळगाव १०, हिंगोली ३, धुळे १, सोलापूर १०, नांदेड १, परभणी २४, जालना ८९, धाराशिव ६, अहिल्यानगर ११९, बीड ९० व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२२ दिंड्यांचा समावेश आहे. यात्रा मैदानासह वाळवंट व इतरत्र फिरती शौचालयांच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी पथके, स्वच्छता पथके, वाहतूक नियंत्रक पथके आदी तैनात आहेत. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

स्वच्छता दिंडीतून केला जागर
नाथषष्ठीनिमित्त पैठणमध्ये स्वच्छता दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करून दिंडी रवाना करण्यात आली. पैठण पंचायत समितीच्या आवारातून दिंडी काढण्यात आली. तहसीलदार दत्ता भारस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र देसले, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, विस्तार अधिकारी दशरथ खराद, माहिती व संवाद तज्ञ डॉ. संजय वाघ आदी उपस्थित होते. पैठण शहरातील प्रमुख मार्गांवरून ही दिंडी नेऊन त्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले.

