छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री विधानसभा मतदारसंघ भाजपकडून आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरसावला आहे. हा मतदारसंघ महायुतीत आपल्याकडे सोडवून घेण्याची मागणी पुढे करण्यात येत आहे. या मतदारसंघावर आ. हरिभाऊ बागडे यांच्या रुपाने आजवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आ. बागडे यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादीला आता हा मतदारसंघ हवा आहे.
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी सांगितले, की आम्ही महायुतीतील घटक पक्ष असून, जिल्ह्यात आम्हाला एकही जागा नाही. विधानसभा निवडणुकीसाठी दोन जागांची मागणी केली आहे. त्यातील एक फुलंब्री आहे. महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्हालादेखील न्याय द्यावा लागेल. वाटाघाटी करत असताना अनेक जागांसाठी तडजोडीदेखील कराव्या लागतात. त्यामुळे फुलंब्री राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावा अशी मागणी आम्ही केली आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आम्ही सक्रीय झाला असून, जनतेच्या अडीअडचणी सोडवत आहोत, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे खरंच अजित पवार गटाच्या वाट्याला हा मतदारसंघ येणार का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. हरिभाऊ बागडे यांनी हा मतदारसंघ कायमच भाजपमय ठेवला आहे. असा हक्काच मतदारसंघ भाजप हातातून जाऊ देईल, याचीही शक्यता कमीच आहे. गंगापूरवरही अजित पवार गटाने दावा केला असून, तिथेही भाजपचा आमदार आहे. तिथून आ. सतीश चव्हाण यांनी निवडणूक लढण्याचे ठरवले आहे.