कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नड ते पिशोर मार्गावरील कोळसवाडी खांडी शिवारात सोमवारी (१० मार्च) पहाटे एकच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटून रसवंतीसाठी ऊस घेऊन जाणारा ट्रक उलटला. यात गावी जाण्यासाठी ट्रकमध्ये बसलेल्या सहा तरुण मजुरांचा उसाखाली दबून मृत्यू झाला. दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
किसन धर्मा राठोड (वय ३०), कृष्णा मूलचंद राठोड (वय ३०), मिथुन मारू चव्हाण (वय २६), मनोज नामदेव चव्हाण (वय २३), विनोद नामदेव चव्हाण (वय २८, सर्व रा. सातकुंड, ता. कन्नड) व ज्ञानेश्वर देविदास चव्हाण (वय २८, रा. बेलखेडा, ता. कन्नड), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. वाकोद (ता. कन्नड) येथील रामू मुरमुडे या शेतकऱ्याच्या शेतातून रसवंतीसाठी ऊस भरून ट्रक (जीजे १० टीव्ही. ८३८६) गुजरात राज्यातील जामनगर येथे रविवारी रात्री निघाला होता. ट्रकमध्ये सातकुंडचे ऊसतोड मजूर बसलेले होते. काहीजण ट्रकच्या केबीनमध्ये, काही केबीनवर, तर काही उसावर बसलेले होते. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक उलटला. सर्व मजूर उसाखाली दबले गेले. माहिती मिळताच कन्नड शहर पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मजुरांना बाहेर काढले.
यात किसन राठोड, कृष्णा राठोड, मिथुन चव्हाण, मनोज चव्हाण या चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर विनोद चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण यांचा कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंदलचंद प्रेमचंद चव्हाण (वय ३१), लखन छगन राठोड (वय २९), सचिन भागिनाथ राठोड (वय २२), राहुल नामदेव चव्हाण (वय १९), रवींद्र नामदेव राठोड (वय २५), सागर भागिनाथ राठोड (वय २५), राणीबाई लखन राठोड (वय ३०), आरती ज्ञानेश्वर चव्हाण (वय २२), ट्रकचालक इस्माईल अब्दुल जेडा व क्लिनर उमर मुसा जेडा गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून गंभीर जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव हलविले. मृत ज्ञानेश्वर चव्हाण व जखमी आरती चव्हाण हे मूळ बेलखेडा तांडा येथील रहिवासी असून, ते सध्या सातकुंडलाच राहतात. सातकुंड हे गाव बंजारा समाजबहुल आहे. शेतीतून कुटुंबाची उपजीविका भागत नसल्याने सर्व तरुण ऊसतोडीचे काम करीत होते.