छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उन्हाळी सुट्यांत पर्यटनाचे नियोजन अनेक कुटुंब करत असतात. हीच संधी साधून विमान कंपन्यांनीही प्रवासाचे दर वाढवले आहेत. समर व्हॅकेशनच्या नावाखाली विमान प्रवासाचे दर ११ ते १८ टक्क्यांनी वाढले आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटकांची पसंती श्रीनगर, भूतान, सिमला, मसुरीला असते. भूतानलाही मोठ्या प्रमाणावर शहरवासी जातात. मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद येथे जाऊन छत्रपती संभाजीनगरकरांना देश-विदेशात प्रवास करावा लागतो. छत्रपती संभाजीनगरहून श्रीनगरला जायचे असेल तर नवी दिल्लीला जावे लागते. सध्या छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठीचे तिकीट ४१३६ रुपये असून, सुटीमुळे ते ४३६२ रुपये (जूनपर्यंत) वाढले आहेत. मुंबई-श्रीनगर (सीझन तिकीट) ४३६२ रुपये आहे. सुटीमुळे ते १०६२८ (एप्रिलपर्यंत) झाले आहे. छत्रपती संभाजीनगर- नवी दिल्ली आताचे दर ५३४७ असून, सुटीमुळे ते ६६३० रुपयांवर (जूनपर्यंत) गेले आहेत.