छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात २०२०-२१ मध्ये ६१७ आणि ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या काळात २१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांनी वर्षभरात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र १२९ सदस्यांनी ते मुदतीत सादर केले नाही. त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी तीन तालुक्यांतील ७५ सदस्य अपात्र ठरविण्यात आले होते.
सिल्लोड तालुक्यात ६९, कन्नड तालुक्यात ६० सदस्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. शिवना (ता. सिल्लोड) येथील सरपंच कौशल्याबाई रघुनाथ वाघ यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले. हळदा- डकला ((ता. सिल्लोड) ग्रुप ग्रामपंचायतीतील ११ पैकी ७ सदस्य अपात्र झाले. यात उपसरपंच नटवर गवळे यांचाही समावेश आहे. सिल्लोडच्याच आमसरी ग्रामपंचायतीतील ९ सदस्यांपैकी ५ सदस्य अपात्र ठरले. त्यात उपसरपंच आत्माराम पाडळेंचाही समावेश आहे.