छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ठाकरे गटाने पैसे घेऊन विधानसभा निवडणुकीत तिकीटे वाटल्याचा आरोप शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ८ दिवसांच्या शिवसैनिकाला माझ्याविरुद्ध मैदानात उतरवले, तेव्हा कुठे गेले होते तुमचे शिवसैनिक असा प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. दरम्यान, आ. अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हेंवर टीका करताना याला नमक हरामी म्हणतात, अशी जहरी टीका केली.
जिल्ह्यापुरते बोललो तरी छत्रपती संभाजीनगर पश्चिम, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे सर्व उमेदवार कुठे आहेत?, असा सवाल त्यांनी केला. ज्या शिवसैनिकांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या ते सर्व बाजूला गेले आहेत. आता बोलणारे दलाल आहेत. शिवसेनेची उमेदवारी देताना बाळासाहेब ठाकरे उमेदवाराला विचारायचे की, बाळा तुझ्याकडे पैसे आहेत का? तुला काही मदत लागते का? नंतर मात्र त्याउलट चित्र दिसू लागले. तिकिटासाठी किती पैसे देतो, असे म्हणणारे तयार झाले, असा आरोप शिरसाट यांनी केला.
नीलम गोऱ्हेंची घेतली बाजू…
नीलम गोऱ्हे बोलल्या तर सर्व तुटून पडले. त्यांच्या घरावर महिला पाठवल्या. यातून तुमची मर्दानकी दिसते का? आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही जास्त खोलवर गेलो तर तुमचे अवघड होईल. महापालिकेचे व्यवहार कसे होतात? कोणत्या हॉटेलमध्ये होतात? त्या वेळी बाजूला कोण कोण असते? हे सर्वांना माहिती आहे, असे शिरसाट म्हणाले. आम्हाला उगाच आरोप करायचे नाहीत. जे सत्य आहे ते तुम्हाला मान्य करावेच लागेल, असे ते म्हणाले. आज तुमचे जे सुरू आहे त्यामुळेच पक्ष रसातळाला गेला, अशी टीकाही शिरसाट यांनी केला.
याला नमक हरामी म्हणतात : अंबादास दानवे
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर टीका करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे म्हणाले, की नीलम यांना इतक्या वेळेस विधान परिषदेवर निवडून आणले. दरवेळेस त्यांनी २ मर्सिडीज दिल्या असतील तर १२ मर्सिडीज व्हायला हव्यात. कुठेत या १२ मर्सिडीज, असा सवाल दानवे यांनी याला नमक हरामी असे म्हणतात, अशी जहरी टीका केली.