सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे निंबायती (ता. सोयगाव) येथील अकील मुसा तडवी (वय ३०) या शेतकऱ्याने जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी-मेनगाव रस्त्यावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी दोनला समोर आली.
तडवी यांच्या एकत्रित कुटुंबाची निंबायती शिवारात पाच एकर शेती आहे. तडवी यांच्याकडे राष्ट्रीयीकृत बँकेसह खासगी असे एकूण २ लाख ६० हजार थकीत कर्ज होते. खरीप आणि रब्बी हंगामातही निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने कर्ज फेडण्याची त्यांना चिंता होती. यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. तडवी यांना जामनेर तालुक्यातील पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले होते, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत पहूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.