छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच पक्षबदलासाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते राजू शिंदे अखेर रविवारी शिवबंधन बांधून घेत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात विसावले. शिंदे यांचा हा प्रवेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच झाल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. शिंदे यांनी सोडून जाणे हा भाजपला धक्का तर आहेच, पण सोबतच विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही सेनेच्या नेत्यांसाठीही हा जांगडगुत्ता होऊन बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
कधी काळी अपक्ष असलेले राजू शिंदे नंतर भारतीय जनता पक्षात स्थिरावले आणि नगरसेवक, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. या माध्यमातून त्यांनी शहरात स्वत:चे प्रस्थ वाढवले. अनेक व्यवसाय, उद्योग सुरू करून पैसाही उभा केला. याच पैशांच्या जोरावर मग त्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी नशीबही आजमावले. शिंदे हे मागासवर्ग समाजातील असून, 2019 ला त्यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी आता शिंदे गटात असलेल्या शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्यापुढे शड्डू ठोकून त्यांना घाम फोडला होता. त्यावेळी शिंदे यांचा सुमारे 40 हजार मतांनी पराभव झाला असला तरी त्यांनी 42 हजारांवर मतेही घेतली होती, हेही विसरून चालता येणार नाही.
आताही शिंदे यांना आमदारकी खुणावत असून, तेच स्वप्न घेऊन त्यांनी आता भाजपचे कमळ खुरडून मशाल हाती घेतल्याचे स्पष्ट आहे. गेल्या काही वर्षांत राजू शिंदे यांनी पश्चिम मतदारसंघात मोठे राजकीय प्रस्थ अशी स्वत:ची ओळख निर्माण करण्यात यश मिळवल्याचे नाकारता येणार नाही. आमदारकी डोक्यात असली तरी पश्चिम मतदारसंघ शिवसेना-भाजप युती असल्यापासूनच शिवसेनेच्या वाट्याला आहे. 2019 ला हे दोन्ही पक्ष वेगळे होऊन स्वतंत्र लढल्यावरही शिवसेनेच्या (तेव्हा एकत्रित, आता शिंदे गट) संजय शिरसाट यांनी बाजी मारण्यात यश मिळविले होते. आगामी निवडणुकीतही या मतदारसंघात शिरसाटच शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार असतील, हे निश्चित मानले जाते. आता भाजप आणि शिंदेंची सेना यांचे हातात हात असल्याने या मतदारसंघावर भाजप दावा ठोकणार नाही, याची जाणीव भाजपेयींसह शिंदे यांनाही होती. याच सर्व बाबी हेरून शिंदे यांनी भाजप सोडून शिवबंधन बांधून घेतल्याचे स्पष्ट आहे.
मागच्या वेळी अपक्ष असूनही शिंदे यांनी जोरदार लढत दिल्याने यावेळी ते पुन्हा मैदानात उतरल्यास शिरसाट यांची डोकेदुखी वाढू शकते. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत दुसर्यांदा पराभूत झालेले ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना या मतदारसंघातून विधानसभेसाठी तिकीट देण्याची मागणी त्यांचे समर्थक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करीत आहेत. स्वत: खैरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी पुन्हा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती खरी; पण आता त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास विधानसभेच्या आखाड्यात उतरू, अशी भाषा सुरू केली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि खैरे यांना टीकेचे प्रमुख केले होते. आता त्याचा बदला घ्यायचा, तर खैरेच विधानसभेला प्रभावी उमेदवार ठरू शकतील, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. यामुळे खैरेंनाही पुन्हा आमदारकीची स्वप्ने खुणावू लागली होती. पण राजू शिंदे ठाकरे गटात आल्याने खैरे यांचे स्वप्न अर्धवट राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण शिंदे आमदारकीच्या तिकिटाचा शब्द घेऊनच ठाकरे गटात आल्याचे स्पष्ट आहे.
शिंदेंमुळे आपली उमेदवारी धोक्यात आल्याचे स्पष्ट होताच खैरे यांनी शिंदे यांच्या आगमनाला विरोध केल्याचे दिसत आहे. राजू शिंदे यांना लोकसभा निवडणुकीआधीच ठाकरे गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण ते त्यावेळी भाजपमध्येच थांबले. एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना मदत करून त्यांनी निवडूनही आणले. संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून भुमरे यांना मताधिक्य मिळवून देण्यातही मदत केली आणि यामुळेच आपला पराभव झाला, अशी सल खैरे बोलून दाखवत आहेत. एवढेच नाही तर राजू शिंदे यांच्यामुळे दोनदा आपला पराभव झाल्याचे दु:ख व्यक्त करताना खैरे आता ते (राजू शिंदे) ठाकरे गटात आल्यावर पक्षासाठी काम करतील, अशी आशाही व्यक्त करीत आहेत.
खैरे यांच्या या बोलण्यातून त्यांच्या पश्चिम मतदारसंघातील विधानसभा उमेदवारीला शिंदे यांच्या आगमनाने खोडा बसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यातूनच खैरे लोकसभेला दोनदा पराभूत झाल्याने आता ठाकरे गटालाही ते विधानसभेला निवडून येतील, याचा भरोसा वाटत नसल्याने त्यांनी भाजपमधून शिंदे यांच्या रूपाने उमेदवार आयात केल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीला आता अवघे तीन महिने उरले आहेत. अशा वेळी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, नेत्यांची पळवापळवीही सुरू झाली आहे. राजू शिंदे यांनी पक्षातून बाहेर जाण्याने भाजपची या मतदारसंघातील ताकद काही अंशी कमी झाली, हे उघड आहे. सोबतच ठाकरे गटाची ताकद वाढल्याचेही स्पष्ट आहे. आता ठाकरे गट शिंदे यांची उमेदवारी कधी घोषित करतो, ज्या अपेक्षेने ते ठाकरे गटात गेले, ती अपेक्षा खरेच पूर्ण होते का, उमेदवारी मिळाली तरी ते खरेच शिरसाट यांना लढत देउ शकतील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता काळच देउ शकणार आहे.